Thursday, 16 July 2026

"रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म !

 "रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म ! 

नाशिक येथील चिखलवाडी येथे ८ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत "रंगभूमी: सृजन आणि संवर्धन कार्यशाळा" संपन्न झाली. ही कार्यशाळा रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी उत्प्रेरित केली.

रंगभूमी हा सृजनेचा जिवंत झरा आहे. ती कलाकारांना जीवनदान देते आणि समाजाला नवी दिशा दाखवते. रंगभूमी ही खरंतर विचारांची भूमी आहे. अनेक कलाकार या रंगभूमीवर येतात; रंगभूमी त्यांना नाव देते, त्यांचे अस्तित्व निर्माण करते आणि त्यांना एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाते. कलाकाराला नाव, पैसा, प्रसिद्धी हे सगळं रंगभूमीमुळेच मिळतं. पण जेव्हा हे कलाकार मोठे होतात, तेव्हा ते या रंगभूमीला काय परत देतात? रंगभूमीच्या निर्मितीसाठी आणि ती निरंतर कार्यान्वित राहण्यासाठी ते काय करतात? हे महत्त्वाचे प्रश्न आज समोर उभे ठाकले आहेत.




गेल्या ३४ वर्षांपासून 'थिएटर ऑफ रेलेवंस' हा नाट्य सिद्धांत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी सृजनेचा झरा बनला आहे. रंगभूमी जनमानसात पोहोचवण्यासाठी या माध्यमातून सातत्याने प्रयोग होत आहेत. रंगभूमीच्या निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'प्रेक्षक'. समाजातील तळागाळातील वर्ग, मध्यमवर्ग आणि उच्च वर्ग अशी कोणतीही भिंत न ठेवता, प्रेक्षक-संवादाच्या माध्यमातून सर्वांना एका मंचावर, एका समपातळीवर आणण्याचे काम हा सिद्धांत करतो; त्यांच्यामध्ये माणुसकीचा बोध निर्माण करतो आणि त्यांचा विवेक जागृत करतो.

रंगकर्मी हा स्वतः जगलेले क्षण किंवा समाजात घडणाऱ्या घटनांना पुन्हा जिवंत करून, एक व्यापक दृष्टी ठेवून कला सादर करत असतो. आपल्या कलेचा हाच बोध त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो. या प्रक्रियेसाठी कलाकाराने सतत जागरूक राहून निरीक्षण (Observation) करणे आवश्यक आहे. ते क्षण जगत असताना कलाकाराच्या आत निर्माण होणारे भाव, त्यातून घडणारी कृती (Action) आणि मिळणारा बोध हे समजून घेणे गरजेचे असते.

"रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म !

या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही एका ओढ्यात गेलो. पाण्यात पाय ठेवताना होणारा पाण्याचा स्पर्श आणि अंगावर आलेले शहारे, हे माझे नैसर्गिक भाव जागृत करत होते. हे भाव मला माझ्या स्वतःशी जोडत होते, मला एकरूप करत होते. संपूर्ण पाण्यात बुडताना होणारा तो स्पर्श माझ्यातील व्यक्तीला आणि कलाकाराला 'प्रवाहित' राहण्याचा संदेश देत होता. निसर्गाचा हा प्रवाह कधीच थांबत नाही, तो नेहमी प्रवाही असतो. मग मी माझ्या भावनांचा आणि विचारांचा प्रवाह का थांबवला आहे? निसर्गाप्रमाणे मी स्वतःला प्रवाही का ठेवत नाही? हा प्रश्न मला पडला आणि क्षणात माझ्यातील 'अहं' गळून पडला. मी स्वतःहून पुढाकार घेऊन परफॉर्म करू लागलो. या सादरीकरणाच्या प्रवासात एक कलाकार म्हणून मला जे महत्त्वाचे सूत्र गवसले, ते म्हणजे "निरीक्षण आणि स्पर्श" (Observation and Touch).




जन्म ते मुक्ती हा प्रवास आपण सगळेच करतो, पण तो करताना आपल्याला त्याची खरी जाणीव असते का? कारण हाच प्रवास आपल्या अस्तित्वाची पायवाट निर्माण करतो, जी येणाऱ्या पिढ्यांना रस्ता दाखवते. चैतन्य अभ्यास करण्यासाठी आम्ही निसर्गाच्या सानिध्यात गेलो. तिथे जाण्यापूर्वीचा रस्ता, वाटेत येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांना तोंड देताना मी घेतलेली काळजी... या सगळ्यावरून मला एक जाणवले की, मी आयुष्यात फक्त पळतोय की या प्रवासाचा आनंद घेतोय? आयुष्यातील चढ-उतार, वळणे आणि खाचखळग्यांतून जाताना येणारा अनुभव मी खऱ्या अर्थाने जगत आहे, याची तीव्र जाणीव मला नदीच्या पात्रातून चालताना झाली. दगडांवरून चालताना पाय घसरत असतानाही अत्यंत सावधपणे टाकलेली पावले मला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचा मार्ग दाखवून गेली. एखादा मोठा दगड समोर आला तरी त्याला भेदून पाणी जसे पुढे निघून जाते आणि नदी आपली वाट निर्माण करते, तसेच आपल्यालाही पुढे जायचे आहे.

सतत प्रवाहित राहणं म्हणजेच अधात्म आहे. 


नदीच्या पात्रात झोपल्यावर मला जाणवले की, सुरुवातीला थंड वाटणारे पाणी काही काळाने उबदार भासू लागले. डोळे बंद करून आकाशाकडे तोंड करून झोपलो असताना मला वाटले की, मी संपूर्ण आकाश माझ्या डोळ्यांत सामावून घेतले आहे. बंद डोळ्यांसमोर लाल रंगाचा रक्ताचा प्रवाह दिसत होता. पाण्याच्या त्या उबेमुळे मला मी आईच्या गर्भात असल्याचा भास झाला, जणू तिच्या पोटातूनच मी हे संपूर्ण जग पाहत होतो.



माझ्यातील उदासीनता दूर होऊन मोकळी हवा माझ्या शरीरात संचार करू लागली आणि माझ्यातील भावना तरंगू लागल्या. आयुष्याचा एकेक टप्पा पार करताना एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून मला स्वतःला अधिक भक्कम करायचे आहे. टेकडी चढून वर गेल्यावर एक असा टप्पा आला, जिथे मोकळ्या हवेने मला वेढले. मी स्वतःशी पूर्णपणे एकरूप झालो. मोकळ्या आकाशात पाहताना ढग जमिनीवर चालत असल्याचा भास होत होता. ढगांच्या आडून येणारी सोन्यासारखी किरणे थक्क करत होती आणि निसर्गाचे बहुआयामी रूप दाखवत होती. हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, पांढरा, केशरी, पोपटी, तपकिरी अशा विविध रंगांची उधळण मला तिथे दिसली. रंगभूमी देखील अशीच विविध रंगांनी बहरलेली आहे, याची अनुभूती मला आली.




त्या माळरानावर मोठी झाडे का नाहीत, हा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा मला दोन उत्तरे मिळाली—एक म्हणजे हवेचा तीव्र वेग आणि दुसरे म्हणजे मातीच्या थराखाली असलेला कठीण खडक. आयुष्यातही कधीकधी आपण अशा टप्प्यावर असतो, जिथे जीवन मर्यादित असते आणि आपण एकांतात असतो. पण त्या उंचीवरून जेव्हा आपण जमिनीकडे पाहतो, तेव्हा माणसांचे व्यवहार स्पष्ट दिसतात. ती उंची माणसाला स्वतःच्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरित करते. आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांकडे तटस्थपणे, बाहेरून पाहता यायला हवं , हा मोठा धडा मला निसर्गाने आणि रंगभूमीने दिला.



स्वतः जगलेले क्षण जेव्हा मी एकट्याने परफॉर्म केले, तेव्हा ते सहज करता आले. एका सहकलाकारासोबत परफॉर्म केले, तेव्हा ते क्षण अनुभवता आले, जगलेला अनुभव आणि दृष्टी मांडता आली. परंतु, जेव्हा ग्रुपसोबत परफॉर्म करण्याची वेळ आली, तेव्हा माझ्यासमोर जुनी, साचेबद्ध तालीम आडवी आली. मी जगलेला तो मुक्त प्रवास आणि मला मिळालेली दृष्टी ग्रुप परफॉर्मन्समध्ये मांडताना अडचण येत होती. प्रत्येकाचे इनपुट आणि सहभाग घेऊन दृश्य उभे करताना मला माझ्यातील कलात्मक दृष्टी कमी पडत असल्याची जाणीव झाली. संपूर्ण ग्रुपला अलाईन (Align) करून परफॉर्म करणे हे एक मोठे आव्हान वाटू लागले. पण हिंमत न हारता, टिकून राहणे महत्त्वाचे होते. नुसते उभे राहून उपयोग नव्हता, तर माझ्यातील चेतना मला जागृत ठेवायची होती. अखेर आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर एक दृश्य तयार झाले, जे एक मोठी संकल्पना देऊन गेले—"जीवनचक्राच्या प्रवासात जे बाहेर पडते ते जीवन, आणि जे सतत फिरत राहते ते चक्र!"



या कार्यशाळेत येण्यापूर्वी मी माझ्या व्यक्तिगत कोषात अडकलो होतो. 'मी का करू?', 'कशासाठी करू?' हा अहंकाराचा डोंगर माझ्यात उभा होता. पण आज तो डोंगर वाहून गेला आहे. आता मला जाणवू लागले आहे की, मी रंगभूमीसाठी पूर्णपणे प्रवाही झालो आहे.

रंगकर्मी

तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment